अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीबाबत अधिकृत सुचनांवर विश्वास ठेवा
जिल्हा महिला व बालविकास विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 31 : महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमावलीनुसार व शासन निर्णयानुसार पूर्णपणे गुणवत्ता आधारित, पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने करण्यात येत आहे. प्रक्रियेत निवड करून देण्याचे, गुणवत्तेत वाढ करून देण्याचे, नियुक्ती मिळवून देण्याचे किंवा कोणत्याही प्रकारचे आश्वासन देणाऱ्या व्यक्ती, एजंट, दलाल अथवा मध्यस्थ यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
तसेच कोणत्याही व्यक्तीस भरतीसाठी पैसे, भेटवस्तू किंवा इतर कोणताही आर्थिक मोबदला देऊ नये. अशा प्रकारचा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यास महिला व बाल विकास विभाग कोणत्याही परिस्थितीत मान्यता देत नाही. भरती प्रक्रिया केवळ शासनाने निश्चित केलेल्या पात्रता, गुणवत्ता गुणांकन, कागदपत्र पडताळणी व नियमानुसारच पार पडणार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या शिफारशीमुळे अथवा आर्थिक व्यवहारामुळे उमेदवाराची निवड होणार नाही. जर कोणतीही व्यक्ती अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदावर नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत असेल किंवा फसवणुकीचा प्रयत्न करत असेल, तर संबंधित उमेदवारांनी तात्काळ महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करावी.
सर्व उमेदवारांनी अधिकृत जाहिरात, शासन निर्णय आणि विभागाकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनावर विश्वास ठेवावा. अफवा, सोशल मिडियावरील अप्रमाणित संदेश किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

